A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

'राजकवी' – भा. रा. तांबे

भा. रा. तांबे (१८७४ – १९४१)


B.R. Tambe.jpg
भा. रा. तांबे (१८७४ - १९४१)

'राजकवी' श्री. भास्कर रामचंद्र उर्फ भा.रा. तांबे यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७४ साली मध्यप्रदेशातील झाशी जवळच्या मुगावली या गावी झाला. प्रारंभीचे शिक्षण त्यांनी झांशी येथील पुसाळकर यांच्या खासगी शाळेत आणि त्यानंतर वैदिकाचे शिक्षण घेतले. १८९७ मधे वारूबाई जावडेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.


मध्यप्रदेशात वास्तव्य असल्यामुळे हिंदी आणि उर्दू या भाषेचे त्यातील काव्याचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यानी प्रथम देवासच्या हायस्कूलमध्ये व नंतर युवराजांचे शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यांचे राजघराण्याबरोबर इंदूरला वास्तव्य होते. तेथे संस्थांचे दिवाण, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षण खात्यात रजिस्ट्रार इत्यादी पदे भूषविली. १९३७ मध्ये "ग्वाल्हेरचे राजकवी" हा बहुमान त्यांना मिळाला.

'राजकवी' भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. रेखीव गेय रचना, कल्पकता, गूढगुंजन, रूपकात्मक रचना ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. शिशुगीते, नाट्यगीते, प्रणयगीते, भावगीते अशा विविध स्वरुपांची काव्यरचना त्यांनी केली. साधारण १९०० साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यांनी सुनीत या काव्य प्रकारात काही कविता लिहिल्या. बालगीत व नाट्यगीत हे काव्यप्रकारही त्यांनी तितक्याच समर्थपणे हाताळले व लोकप्रिय केले.

त्या काळातील सुप्रसिद्ध मध्य भारतीय कवी संमेलनाचे १९२६ मध्ये ते अध्यक्ष होते. १९३२ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला.

अशा या सौंदर्यवादी, भावनाप्रधान कवीचे ७ डिसेंबर १९४१ साली निधन झाले. पण आपल्या काव्यामुळे ते आजही अजरामर आहेत.
-~~~~~***~~~~~~

संदर्भ :
प्राचीन काव्यशास्त्र - कंगले र.पं., मौज प्रकाशन, मुंबई, १९७४
अर्वाचीन मराठी काव्यदर्शन - काळे अक्षयकुमार, बनहट्टी प्रकाशन, नागपूर, १९९९.
आधुनिक मराठी कविता: काही रूपे, काही रंग - कुलकर्णी गो. म. , मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे, १९९१.
साठोत्तरी मराठी कविता व कवी - जाधव रा. ग., साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९०
अर्वाचीन मराठी काव्य - जोग रा. श्री., मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, १९४६
आधुनिक मराठी कविता - पंडित भ. श्री., सुविचार प्रकाशन, नागपूर, १९६८.