A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Showing posts with label नारायण सुर्वे (१९२६ – २०१०). Show all posts
Showing posts with label नारायण सुर्वे (१९२६ – २०१०). Show all posts

6 February 2022

लावणी गिरणीची

सात वाजता सकाळी । भोंगा वाजवी भूपाळी ।
सुरू होते पहिली पाळी । मोठ्या डौलात ।
चाक फिरे गरगरा । सूत निघे भरभरा ।
नटवाया वसुंधरा। आमच्या घामातुन ॥

लेवुन सूत नऊवारी । नखरा बाबीणीचा भारी ।
कांडी गोल फेरे मारी । मग साच्यातुन ।
झडपीनं घालुन वारा । कापसा न देई थारा ।
जोडुन तुटलेल्या तारा । तारा जुळवून ॥

ऐका घामाची कहाणी । फिरवी कळ जादूवानी ।
तंतूतंतूला जोडूनी । वस्त्र गुंफून ।
रंग घेउन आभाळाचा । हिरव्या सोनाळ शेताचा ।
सातरंगी इंद्रधनुत । वस्र भिजवून ॥

नाना ऋतूंच्या हो कळा । खुलवी माझा वस्त्रमळा ।
मरवा, मोतिया, पिवळा । तुरा खोवून ।
झोंबती चैत्राच्या झळा । भिजे श्रावणात शेला ।
ऊब चोरितो हिवाळा । हेरून ऋतूंचा हा चाळा ।
विणतो माझा कबीर भोळा । जगा नटवून ॥

मलमल आणिक दोरवा । झोक साडीचा हिरवा ।
शालू पैठणी भगवा । झळके पीतांबर ।
शोभे काळी चंद्रकळा । मोरपिसावानी डोळा ।
जणू गुलाबाचा कळा । टाकी भुलवून ॥



— नारायण सुर्वे

6 April 2012

विझता विझता स्वत:ला

झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते
अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही

असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून
शब्दांनी डोळे उचलून पाहिलेच नाही, असेही नाही

शास्त्र्याने दडवावा अर्थ आम्ही फक्त टाळच कुटावे
आयुष्याचा अनुवाद करा सांगणारे खूप; नाहीत असेही नाही

असे इमान विकत घेणारी दुकाने पाड्यापाड्यावर
डोकी गहाण ठेवणारे महाभाग नाहीत असेही नाही

अशा बेइमान उजेडात एक वात जपून नेताना
विझता विझता स्वत:ला सावरलेच नाही, असेही नाही


- नारायण सुर्वे

(Compiled by : Ms. Bhakti Parab, Mumbai)

16 January 2012

डोंगरी शेत

डोंगरी शेत माझं गं मी बेनू किती?
आलं वरीस राबून मी मरावं किती?

कवळाचे भारे बाई गं घेऊन चढावं किती,
आडाचं पाणी बाई गं पाणी वढावं किती?
चित्रकार : अशोक जाधव, चिंचोली सांगली
घरात तान्हा माझा गं तान्हा रडंल किती,
तान्ह्याचं रडं ऐकून पान्हा येईल किती?

आलं आलं वरीस जमिन नांगरुन,
उभं पीक नाचे सोन्यानं फुलून
पर एक मेला सावकार ठोला,
हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा
असं उपाशी राहून गं आम्ही मरावं किती?

म्हागाइनं बाई घातला हैदोस
गळा आवळी बाई सावकारी फास
कुनाचे देऊ आन कुनाचं ठेवू
अशीच वर्सावर वर्स जातील किती?

या संसारा बाई सांजी येईना
रक्त गाळून अंगा धडूत मिळंना
कष्टाचं फळ बाई पदरांत पडंना
टीचभर पोटाला, हातभर देहाला जपावं किती?

अक्षय ऱ्हाया कुंकू कपाळा
संसार वेलीच्या फुलवाया फुला
रुप नवं आणू माय धरतीला
तोडू जुलमाचे काच, हे रावणी फास,
एकीचं निशाण हाती.


— नारायण सुर्वे

31 December 2011

विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी; जितका आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस

तडजोड केली नाही जीवनाशी; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले

हारलो कैकदा झुंजीत; तूच पदराचे शीड उभारलेस
हताश होऊन गोठलो; तूच पाठीवर हात ठेवलेस.

कसे जगलो आपण, किती सांगू, किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली; नाही बोलवत, नको ती मोजदाद.

अशी उदास, आकुल, डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको
आधीच शरमिंदा झालो आहे; अधिक शरमिंदा करू नको

आयुष्य घृणेत सरणार नाही; हवीच तर घृणाही ठेव
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.


-- नारायण सुर्वे (सनद)

3 April 2010

दोन दिवस

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखांत गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे; याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखांत गेले.


- नारायण सुर्वे (ऐसा गा मी ब्रह्म)