बालकवी (इ.स. १८९० - १९१८) |
बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव इथे इ.स. १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला. मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून त्यांचा यथार्थ गौरव केला जातो. जळगावमधे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) बालकवींनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. तेव्हा त्यांचं वय १७ वर्षं होतं. त्यानंतर ‘बालकवी’ हे नाव रूढ झालं.
त्यांचे वडील बापूराव देवराव ठोंबरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण, अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.
१९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं.
वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं).
अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि:शब्दकळेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात.
वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही अनेक अर्थांनी मर्यादितच राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट. निसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवींनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडून ठेवलं.
५ मे १९१८ रोजी खानदेशातील त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या ट्रेनखाली अडकून बालकवींचा मृत्यू झाला.
संदर्भ -
समग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे (पॉप्युलर प्रकाशन)
बालकवींची कविता : तीन संदर्भ – रमेश तेंडुलकर (मौज प्रकाशन)
फुलराणी – संपादक- कुसुमाग्रज (काँटिनेन्टल प्रकाशन)
त्यांचे वडील बापूराव देवराव ठोंबरे पोलिसखात्यात नोकरीला असल्याने त्यांच्या सतत बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात अडथळे आले. बालकवींना चार भावंडं होती. जिजी ही थोरली बहीण, अमृतराव आणि बाबू हे दोन भाऊ आणि कोकिळा ही बहीण होती. बालकवींची थोरली बहीण जिजी ऊर्फ लक्ष्मीबाई भावे यांनी त्यांना संस्कृतचं प्राथमिक शिक्षण दिलं; कवितेकडेही तिनेच वळवलं. बालकवींनी नंतर स्वतःच्या बळावर संस्कृतमध्ये प्रभुत्व मिळवलं. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचाही त्यांचा अभ्यास होता.
१९०८मधे बालकवींच्या वडिलांचं निधन झालं. कुटुंबातील उर्वरित दोन भाऊ स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असल्यामुळे संसाराची जबाबदारी बालकवींवर येऊन पडली, तेव्हापासून नोकरीसाठी आणि पैशासाठी बालकवींची खटपट सुरू झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर एका वर्षाच्या आत गडबडीने आणि बालकवींच्या मनाविरुद्ध त्यांची आई गोदूताई यांच्या पुढाकाराने बालकवींचा विवाह नाशिकच्या पार्वतीबाई जोशी यांच्याशी करून देण्यात आला. १९०९च्या दरम्यान शिक्षणासाठी काही काळ बडोद्याला असलेल्या बालकवींची तिथेच रेव्हरंड ना. वा. टिळक यांच्याशी गाठ पडली. बालकवींची हालाखीची परिस्थिती पाहून टिळकांनी त्यांना अहमदनगरला आपल्या घरी राहण्यासाठी आणलं.
वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर इथे असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ह्या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेलं नव्हतं (बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर ह्यांनी तिला ‘वनमुकुंद’ असं नाव दिलं).
अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि:शब्दकळेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नाही. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार आहेत. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसतात. आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात.
वयाच्या अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी अपघाती निधन झाल्यामुळे बालकवींचं कवितालेखनही अनेक अर्थांनी मर्यादितच राहिलं. त्यांना जेमतेम दहा-बारा वर्षं कवितालेखन करता आलं, आणि त्यांच्या एकूण कवितांची संख्याही आहे केवळ एकशे त्रेसष्ट. निसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवींनी आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडून ठेवलं.
५ मे १९१८ रोजी खानदेशातील त्यांचे कवीमित्र के. म. सोनाळकर त्यांच्याकडे जाण्यासाठी घाईघाईने रेल्वेस्टेशनकडे निघालेल्या बालकवींचा पाय रूळामध्ये अडकला. याच वेळी येणाऱ्या ट्रेनखाली अडकून बालकवींचा मृत्यू झाला.
-~~~~~***~~~~~~
संदर्भ -
समग्र बालकवी – संपादक : नंदा आपटे (पॉप्युलर प्रकाशन)
बालकवींची कविता : तीन संदर्भ – रमेश तेंडुलकर (मौज प्रकाशन)
फुलराणी – संपादक- कुसुमाग्रज (काँटिनेन्टल प्रकाशन)
No comments:
Post a Comment