हिंदपुत्रांनो, स्वतांला लेखिता कां बापडे ? भ्रांत तुम्हां कां पडे ? 
वाघिणीचें दूध प्यालां, वाघबच्चे फांकडे. भ्रांत तुम्हां कां पडे ? ।। धृ।।
हिंदभू वीरप्रसू जी वैभवाला पावली, कां अतां खालावली?
धन्यता द्याया कुशीला अंग झाडा, व्हा खडे ! ।।१।।
पूर्वजांची थोरवी लाभे पुन्हां बोलून कां ? झिंगुनी डोलूं नका;
लक्ष द्या चोहींकडे, द्या कालवैशिष्टयाकडे ! ।।२।।
जीर्ण त्या कैवल्यकुंडी घाण देखा माजली, डुंबतां कां त्या जली ?
ओज पूर्वीचें न तेथें, तीर्थ तें आतां सडे. ।।३।।
ज्ञानगंगा वाहते पूर्वेकडे, घाला उड्या, अंतरी मारा बुड्या;
संपली पूर्वाग्रहांची रात्र, झालें तांबडे. ।।४।।
मोकळी ही खा हवा, चैतन्य अंगी खेळवा, आत्मशुद्धी मेळवा,
मुंडिती जे फक्त डोके तेच गोटे कोरडें ! ।।५।।
श्रेष्ठता जन्मेंच का ये ? जातिदर्पाला त्यजा, हिंदुतेला या भजा,
नेमका कां भेद भासे ? साम्य सारें कां दडे ? ।।६।।
ब्राम्हणत्वाची बढाई लाज ही वेदास हो ! षड्रिपूंचे दास हो !
लोकसेवा, सत्यशुद्धी ही कराया व्हा सडे. ।।७।। 
कर्मयोगी एक व्हा रे, नायकी वा पायकी, दावुनी घ्या लायकी;
खानदानीतील नादाना, करीं घे फावडे. ।।८।।
जो करी कर्तव्य, घामेजूनि खाई भाकरी, धन्य त्याची चाकरी !
कर्मजा सिद्धी ! न गीतावाक्य हें खोटें पडे. ।।९।।
लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर, हिंदवी व्हा चाकर;
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडें. ।।१०।।
एकनाथाची कशी आम्हांस होई विस्मृती, जो दया मानी स्मृती,
जो कडे घे अंत्यजाचें पोर तान्हे शेंबडें ! ।।११।।
संकराची बंडखोरीची उभारा या ध्वजा ! उन्नती स्वातंत्र्यजा !
राजकी वा गावकी – सारिं झुगारा जोखडें ! ।।१२।।
भारताच्या राउळीं बत्तीस कोटी देवता जागत्या, या पावतां 
मुक्तिसंगें स्वर्ग लाभे– कोण पाही वांकडें ? ।।१३।। 
पोट जाळायास देव्हारे पुजारी माजवी, ईश्वराला लाजवी,
चूड घ्या अन् चेतवा हें रुढ धर्माचे मढें ! ।।१४।।
काय भिक्षेची प्रतिष्ठा ? चैन चाले आयती, मुख्य दीक्षा काय ती ?
कष्टती ते खस्त होती, पोळ साई-जोगडे. ।।१५।।
'बुत् शिकन्’ व्हा ! 'बुत्फरोशी’ कासया बालाग्रही ? भक्त व्हा सत्याग्रही !
मानिती वेड्यास साधु स्वार्थसाधू भाबडे. ।।१६।।
आचरा शांतिक्षमा, निंदोत ते जे निंदिती, संयमीला न क्षिती.
वैरबाधा खास दिव्य प्रेममंत्राने झडे. ।।१७।।
ही अहिंसा प्रेमनीती वाटतां नामर्दुमी, क्षात्रता दावा तुम्ही,
सोडवा क्षेत्रीं लढूनी राज्यसत्तेचे लढे. ।।१८।।
दृष्टि राष्ट्राची हवी स्वार्थातही जी नेहमी, उन्नतीची घे हमी;
जो अहिंदी त्याजला ठेवा दुरी, चारा खडे. ।।१९।।
बंधुला हाणावयाला पत्करुनी दास्यही, शत्रु आणावा गृही
दोष हा राष्ट्रघ्न अद्यापिही देशाला नडे. ।।२०।।
तो असो जैचंद वा राघो भरारी वा कुणी, तो स्वराज्याचा खुनी !
हांकुनी धिक्कारुनी द्या त्यास सैतानाकडे ! ।।२१।।
बंधुलाही गांजुनी जो शत्रुगेहीं मोकली, मूळ साक्षात् तो कली !
ना गणा त्याची प्रतिष्ठा, तें विषारी रोपडें ! ।।२२।।
इच्छितां स्वातंत्र्य, द्या स्वातंत्र्य हें अन्यांसही, का न कोणा आस ही ?
कां गुलामांचे तुम्हां सुल्तान होणे आवडे ? ।।२३।।
'जो बचेंगे तो लढेंगे’ ! शूर दत्ताजी वदे, स्वामिकार्यी जीव दे,
शौर्य हें दावाल का कल्ले मिशांचे आकडे ? ।।२४।।
काळ राष्ट्रांच्या चढाओढींत लोटी खामखा, अंध ऐशाराम कां ?
स्वर्ग जिंका वा मही ! ऐका रणींचे चौघडे. ।।२५।।
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला !
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सांपडे. ।।२६।।
जा गिरीच्या पैल जा ! समृद्धि नांदे वैभवें, तेथ सौंदर्यासवें;
मोकळीकीच्या मुदें उत्कर्ष तेथें बागडे ! ।।२७।। 
शब्द माझे बोबडे अन् ज्ञान माझें तोकडें, चित्त माझे भाबडें. ।।२८।।
– माधव ज्यूलियन ऊर्फ डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन
 
No comments:
Post a Comment