A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

4 January 2010

श्रावणबाळ


शर आला तो, धावुनी आला काळ
विव्हळला श्रावणबाळ
'हा ! आई गे !' , दीर्घ फोडूनी हांक
तो पडला जाऊन झोंक
ये राजाच्या श्रवणी करुणावाणी
हृदयाचे झाले पाणी.
त्या ब्राह्मणपुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवें आणुनी नयनी
तो वदला, 'हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा' !

मग कळवळूनी, नृपास बोले बाळ.
'कशी तुम्ही साधीली वेळ'
मम म्हातारे मायबाप तान्हेले
तरुखाली असती बसले.
कावड त्यांची, घेउन मी काशीला
चाललो तीर्थयात्रेला.
आणाया निर्मळ वारी
मी आलो या कासारी
ही लगबग भरूनी झारी
जो परत फिरे, तो तुमचा शर आला
या उरांत रुतुनी बसला.

मी एकुलता, पुत्र, कसा हा घाला
मजवरती अवचित आला !
त्यां वृद्धपणी, मीच एक आधार
सेवेस अतां मुकणार
जा, बघतील ते, वाट पांखरावाणी
द्या नेऊन आधी पाणी.
आहेत अंध ते दोन्ही,
दुर्वार्ता फोडुं नका ही,
ही विनती तुमच्या पायी
मज माघारी, करा तुम्ही सांभाळ
होउनियां श्रावणबाळ.

परि झांकुनी हे, सत्य कसे राहील ?
विधीलेख न होई फोल
काळीज त्यांचे फाटुन शोकावेगे
ते येतील माझ्यामागे,
"घ्या झारी... मी जातो..." त्याचा बोल
लागला जावया खोल.
सोडीला श्वास शेवटला,
तो जीव विहग फडफडला,
तनु-पंजर सोडूनी गेला
दशरथ राजा, रडला धायीं धायीं
अडखळला ठायीं ठायीं.


— ग. ह. पाटील

स्वर : श्री. श्रीधर फडके

12 comments:

||हाकरोनी सांगे तुका || said...

very very emotional and heartly touching.....

रमेश काळबांधे, नागपूर said...

ही कविता मला पाचव्या किंवा सहाव्या वर्गात १९६०-१९६१ या वर्षीच्या बालभारती मध्ये होती. पहिल्यांदा जेव्हा गुरूजींनी शिकवली तेव्हा सम्पूर्ण वर्गातील मुलामुलींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. इतकी ती हृदयाला भेदून जाणारी कविता आजही तेवढीच लोकप्रिय आणि अजरामर आहे

Unknown said...

मी लहान असताना वडील मला आपल्या जवळ झोपवून ही कविता ऐकावयचे. आज माझी लहान मुलगी ह्या कवितेसाठी आग्रही असते. कितीतरी वर्ष उलटुन जातील, पण कविता अजरामर आणि सदैव श्राव्य राहील.

Unknown said...

हो खरं आहे. मला खुप आवडते.मी स्वतः जवळ जवळ रोज एकदा तरी बोलतेच.

Unknown said...

माझे आजोबा लहानपणी मला हीच कविता ऐकवयचे... त्यांच्या कुशीत बसून ही कविता ऐकत ऐकत मी लहानाचा मोठा झालो... आज आजोबा तर नाहीत, पण ही कविता जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा माझ्या आजोबांची खूप आठवण येते

Unknown said...

ही कविता माझे आईला शाळेत असताना होती अस ती आजच्या निरर्थक कविता ऐकून सांगतअसते व ती ही कविता आजही तालासुरात म्हणते

प्रकल्प यादी 5 वी said...

माझे वडील लहानपणी ही कविता म्हणायचे.

Unknown said...

ही कविता मला 1963 मध्य ४ थित होती फार आवडायची आज माझ वय ६९ आहे

Unknown said...

जूने ते सोने,बस आणखी काय वर्णु.माणसीक सुख देतात हे क्षण

Ashok said...

मराठी बालभारती, मध्यप्रदेश पाठ्यपुस्तक निगम मध्ये सुद्धा काही कविता होत्या त्यांचा या ब्लॉग मध्ये समावेश करता येईल काय? माझ्या आठवणीतील काही कविता मी पाठवू शकेन.

Suresh Shirodkar said...

अशोक साहेब, आपल्याकडे असलेल्या कविता आपण मला मेलवर पाठवल्यास नक्कीच ब्लॉगवर समाविष्ट करता येतील.

Unknown said...

ही कविता माझी आई मला ऐकवायची