A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

14 January 2016

वारूळ

वारूळ वारूळ मुंग्यांचें वारूळ
कृमी-कीटकांनी बांधिलें देऊळ
मृत्तिकेचे कण एकेक घेऊन
स्वतंत्र, दुर्गम बांधिलें भुवन
तुफान वाऱ्याला ऊन पावसाला
द्यावया आव्हान बांधिलें कष्टून.
आणि कण कण जमविलें अन्न
कष्टाळू भंगूर क्षणायू जीवन
परंतु जीवांनो, तुम्ही वारुळांत
जीवनाचें सुख आहांत भोगीत.
असेल लाभत मायेचा उबारा
आणिक संकटी मित्रांचा निवारा
स्वातंत्र्याचे वारे तुम्ही सेवणारे
तुम्हां कोण म्हणे दुर्बळ बिचारे !
तुमच्या मनाचे तुम्ही मुखत्यार
वारुळांत तुम्ही स्वत:च ईश्वर
वारुळांत नसे शत्रूंना प्रवेश
सत्कारार्थ त्यांच्या लक्षावधी दंश.
परी कधीं येतां सर्पाचें संकट
दुर्बळांना येई सामर्थ्य अफाट !
कोट्यावधी जीव पडती तुटून
लक्षावधी जीव जाती चिरडून.
स्वातंत्र्याचें अंगी संचरोनी वारें
हटविती अंती सर्पांना माघारे


— श्रीकृष्ण पोवळे

संकल्पना : श्रीमती वनमाला पाटील, जालना

4 January 2016

कृतज्ञता

पोर खाटेवर मृत्युच्याच दारा
कुणा गरिबाचा तळमळे बिचारा;
दूर आई राहिली कोकणात,
सेविकेचा आधार एक हात !

ताप त्याने भरताच तडफडावे;
पाखराने एकले फडफडावे
ह़ळू गोंजारी सेविका दयाळू;
डाक्तराचे वच शांतवी कृपाळू.

कधी त्याने घ्यावे न मुळी अन्न,
कुठे डोळे लावून बसे खिन्न;
आणि डाक्तर येतांच गोंजराया
हाय ! लागे तो घळघळा रडाया !

एक दिन तो व्याकूळ फार झाला
आणि त्याने पुसिले डाक्टराला -
"अतां दादा, मरणार काय मी हो ?"
तोंच लागे अश्रुची धार वाहो !

हृदय हेलुनी डोळ्यात उभे पाणी,
तरी डाक्तरची वदे करुण वाणी;
दोन गोष्टी सांगून धीर देई
पुन्हा गोंजारुन शांतवून जाई.

रात्र अंधारी माजली भयाण
सोसवेना जीवास अतां ताण
हळूच बोलावी बाळ डाक्तराला
तोहि धर्मात्मा धांवुनीच आला

अतां बाळाला टोचणार, तोच
वदे वासुन पांखरू दीन चोंच -
"नको आता ! उपकार फार झाले !
तुम्ही मजला किती...गोड...वागविले !

भीत... दादा... मरणास... मुळी... नाही !
तू...म्ही...आई...!!" बोलला पुढे नाही !
झणी डोळे फिरविले बालकाने
आणि पुशिली लोचनी डाक्तराने.


— शंकर केशव कानेटकर (कवी गिरिश)

संकल्पना : श्री किरण भावसार, वडांगळी, सिन्नर