A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

4 October 2012

दीपविसर्जन

(एके दिवशी संध्याकाळी नर्मदातटावर कांही मुली दिवे सोडीत होत्या; तो प्रसंग स्मरून हि कविता लिहीली होती.)


करीं आरती घेउनी आर्यबाला
त्वरें पातल्या नर्मदेच्या तटाला;
करूनी तयांनीं सरित्पूजनाला
प्रवाहीं दिली सोडुनी दीपमाला. ।।१।।

अहा काय शोभा वदूं त्या क्षणाची
तृषा शांत झाली मदीयेक्षणांची;
तदा अस्तगामी जरी अंशुमाली
मना वाटलें यामिनी काय झाली. ।।२।।

सरित्पात्र तें स्वच्छ तैसें विशाल
तदा भासलें कीं दुजें अंतराल;
तती त्यावरी शोभली दीपिकांची
उदेली जणों पंक्ति कीं तारकांची. ।।३।।

जशी अंतरिक्षी फिरे चंद्रकोर
प्रवाहीं करी रम्य नौकाविहार;
नभीं स्वैर संचारती मेघखंड
जलीं खेळती वीचि तैशा उदंड. ।।४।।

अशी दिव्य शोभा पहातां पहातां
मनी शांत झालों, लया जाय चिंता;
झणी सूचली कल्पना एक चित्ता
असे सर्व सृष्टीस जी मूलभूता. ।।५।।

दिले सोडूनी दीप जें बालिकांनीं
दिला सारिखा वेग सर्वां तयांनीं
तयांची स्थिती तत्क्षणी भिन्न झाली
वरी दृष्य कोणी, कुणी जाय खालीं. ।।६।।

कुणी गुंतुनी राहिले भोव‍र्‍यात
जलौघासवें जाय कोणी वहात;
तयांतील काही तटा अन्य गेले
पुढें जाउनी अल्प मागेंचि आले. ।।७।।

जसे दीप तैसे असंख्यात जीव
प्रभू निर्मितो, थोर ज्याचा प्रभाव;
तयां सोडुनी देत काल-प्रवाहीं
वहाती तदौघासवें सर्व देही. ।।८।।

कुणी रंक होई, कुणी होय राजा
दुजा देखणा हो, तिजा हीनतेजा;
कुणी मूर्ख होई, कुणी हो शहाणा
कुणी धैर्यशाली, तसा भ्याड जाणा. ।।९।।

"तसे कां करावें ?" "असें मी करींन"
वृथा वल्गना मानवांच्या अजाण;
स्थितीचा असे किंकर प्राणिमात्र 
स्थिती त्या करी पात्र किंवा अपात्र. ।।१०।।

जरी राहिलें नर्मदातीर दूर
जरी आज बाला न दृष्टीसमोर;
स्मरोनी तरी दीपसर्गप्रसंग 
झणी हर्षयोगें भरे अंतरंग. ।।११।।



 माधवानुज (डॉ. काशिनाथ हरी मोडक)

No comments: