A NON-PROFIT

A NON-PROFIT, NON-COMMERCIAL PUBLIC SERVICE INITIATIVE BY SURESH SHIRODKAR

रम्य ते बालपण!

'श्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन! वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.

साधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...!!

सुचना:

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
महत्त्वाची सुचना: ह्या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून आंतरजालावर केवळ हा एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना आंतरजालावर एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.

येथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती.

ह्या ब्लॉगवरील कविता कॉपी पेस्ट (Copy & Paste) करता येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. तुम्ही या उत्तमोत्तम कविता वाचाव्यात, त्यांचा आनंद घ्यावा याचसाठी आंतरजालावर उपलब्ध करुन दिल्या आहेत. आपणांस या कविता विनासायास एकाचठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी संग्राहकाने घेतलेले कष्ट, वेळ आणि श्रम याची बूज राखणे अपेक्षित आहे. कॉपी पेस्टचा अंगवळणी पडलेला शॉर्टकट चोखाळण्यापेक्षा ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करावा असे संग्राहकाला वाटते. एखादी कविता तुमच्या संग्रही असावी असं वाटलं तर ती लिहून काढा, अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.

कृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद !

- सुरेश शिरोडकर (संग्राहक)
balbharati.suresh@gmail.com
skarsuresh@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

30 August 2010

आई

आई एक नाव असत
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

जत्रा पांगते पाल उठतात
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरच काय असते,
लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
दुधावरची साय असते, लेकराची माय असते

आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही.


- फ. मुं. शिंदे

23 August 2010

एखाद्याचें नशीब

(शार्दुलविक्रिडीत)

कांहीं गोड फुलें सदा विहरती स्वर्गांगनांच्या शिरीं,
कांहीं ठेवितसे कुणी रसिकही स्वच्छंद हृन्मंदिरीं
कांहीं जाउनी बैसती प्रभुपदीं पापापदा वारि तें,
एखादें फुटकें नशीब म्हणुनी प्रेतास शृंगारितें !

कोणी पर्वत आपुल्या शिरीं धरी हैमप्रभा शीतला,
कोणाच्या उदरामधून निघती मोठया नद्या निर्मला;
कोणाला वनदेवता वरितसे मोदांत जी नाहते,
एखाद्यामधुनी परंतु जळती ज्वालानदी वाहते !

झाडें जोडुनि पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोच सगळ्या पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुले विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी तया जाळते पोळते !

चाले खेळ असा जगात; बहधा सौख्यांत सारे जरी,
एखादा पडतो तसाच चुकुनी दु:खार्णवीं यापरी
पाही कोण अशा हताश हृदया? जो तो असे आपला,
देवा ! तूं तरि टाकिं अश्रु वरुनी, त्यासाठिं तो तापला !


— गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी)

18 August 2010

भय इथले संपत नाही..

भय इथले संपत नाही... मज तुझी आठवण येते...
मी संध्याकाळी गातो... तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेली नाजूक भोळ्या, वार्याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळांपाशी, मी उरलासुरला थेंब

संध्येतील कमळासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई


 कवी ग्रेस

माझी कन्या

गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या ?
कां गं गंगायमुनाहि या मिळाल्या ?
उभय पितरांच्या चित्त-चोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला ?

उष्ण वारे वाहती नासिकांत
गुलाबाला सुकविती काश्मिरात,
नंदनांतिल हलविती वल्लरीला,
कोण माझ्या बोलले छबेलीला ?

शुभ्र नक्षत्रे चंद्र चांदण्याची
दूड रचलेली चिमुकली मण्यांची
गडे ! भूईवर पडे गडबडून,
कां गं आला उत्पात हा घडून ?

विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

तुला 'लंकेच्या पार्वती' समान
पाहुनीया, होवोनि साभिमान
काय त्यांतिल बोलली एक कोण
"अहा !— आली ही पहा— भिकारीण !"

मुली असती शाळेतल्या चटोर;
एकमेकीला बोलती कठोर;
काय बाई ! चित्तांत धरायाचे
शहाण्याने ते शब्द वेडप्यांचे ?

रत्‍न सोने मातीत जन्म घेते,
राजराजेश्वर निज शिरी धरी ते;
कमळ होते पंकांत, तरी येते
वसंतश्री सत्कार करायाते.

पंकसंपर्के कमळ का भिकारी ?
धूलिसंसर्गे रत्‍न का भिकारी ?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी ?
कशी तूही मग मजमुळे भिकारी ?

बालसरिता विधुवल्लरी समान
नशीबाची चढतीच तव कमान;
नारि-रत्‍ने नरवीर असामान्य
याच येती उदयास मुलांतून.

भेट गंगायमुनांस होय जेथे,
सरस्वतिही असणार सहज तेथे;
रूपसद्‍गुणसंगमी तुझ्या तैसे,
भाग्य निश्चित असणार ते अपैसें.

नेत्रगोलांतुन बालकिरण येती,
नाच तेजाचा तव मुखी करीती;
पाच, माणिक आणखी हिरा मोती
गडे ! नेत्रां तव लव न तुळो येती.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे;
तसे गाली हासतां तुझ्या व्हावे,
उचंबळुनी लावण्य वर वहावे !

गौर कृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्धृताचा
खेळ चाले लघु रंगदेवतेचा !

काय येथे भूषणे भूषवावे,
विविध वसने वा अधिक शोभवावे ?
दानसीमा हो जेथ निसर्गाची,
काय महती त्या स्थली कृत्रिमाची !

खरे सारे ! पण मूळ महामाया
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.

त्याच हौसेतुन जगद्रूप लेणे
प्राप्त झाले जीवास थोर पुण्ये;
विश्वभूषण सौंदर्यलालसा ही
असे मूळातचि, आज नवी नाही !

नारि मायेचे रूप हे प्रसिद्ध,
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध;
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू,
विलासाची होशील मोगरी तू !

तपःसिद्धीचा ’समय’ तपस्व्याचा,
’भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा 'स्वर्ग’ की, कुणाचा,
’मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा.

’यशःश्री’ वा ही कुणा महात्म्याची,
’धार’ कोण्या रणधीर कट्यारीची
दिवसमासे घडवीतसे विधाता
तुला पाहुनि वाटते असे चित्ता !

तुला घेइन पोलके मखमलीचे,
कुडीं मोत्यांची, फूल सुवर्णाचे,
हौस बाई ! पुरवीन तुझी सारी,
परी आवरि हा प्रलय महाभारी !

ढगें मळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट !

प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे,
कोड किंचित पुरवितां न ये त्यांचे;
तदा बापाचे ह्रदय कसे होते,
न ये वदतां, अनुभवी जाणती ते !

माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा !
प्राप्त होतां परि हे असे प्रसंग
ह्रदय होते हदरोनिया दुभंग !

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना ?
लांब त्याच्या गावास जाऊनीयां
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीयां !

"गावी जातो" ऐकतां त्याच कालीं
पार बदलुनि ती बालसृष्टि गेली !
गळा घालुनि करपाश रेशमाचा
वदे, "येते मी" पोर अज्ञवाचा !



— नारायण मुरलीधर गुप्ते (कवी बी)


टिप : पाठ्यपुस्तकात फक्त आठच कडवी आहेत. 
गाणे (ध्वनिमुद्रण) ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या

14 August 2010

नीतिशतकांतील वेंचे : १

भर्तृहरीच्या "शृंगार", "नीति", आणि "वैराग्य" या तीन्ही मूळ संस्कृत शतकांचे वामन पंडितांनी मराठी अनुवाद केलेत; पण पाठ्यपुस्तकांमध्ये नीतिशतकातलेच श्लोक निवडून दिले जातात. त्यापैकी काही निवडक श्लोक इथे चार भागांत विभागून दिले जातील.


[वसंततिलका]
कीं तोडिला तरु फुटे अणखीं भरानें
तो क्षीणही विधु महोन्नति घे क्रमानें
जाणोनि हें सुजन ज्या दुबळीक आली
त्याशीं कधीं न करिती सहसा टवाळी ll १ ll


[शार्दूलविक्रीडित]
शाणोल्लेख जया असा मणि, रणि जो वीर घायाळला
सांभोगें शिणली अशी नववधू, हस्ती न मस्तावला
ज्यांची स्वच्छ शरदृतूंत पुलिने त्या निम्नगा, चंद्रही
विजेची, प्रभु पात्रदत्तधन जो— हे शोभती सर्वही ll २ ll


[उपजाति]
तृणें मृगाला सोलिलें झषाला
संतोष हे वृत्ति महाजनाला
तयांस निष्कारण सिद्ध वैरी
किरात-कैवर्तक-दुष्ट भारी ll ३ ll


[शिखरिणी]
महिपृष्ठी केव्हां अवचट पलंगी पहुडलो
क्षुधेतें शाकान्ने अवचट सदन्ने निवटितो
कधीं कंथाधारी अवचट सुवस्त्री मिरवितो
मनस्वी कार्यार्थी किमपि सुखदु:खे न गणितो ll ४ ll


[शार्दूलविक्रीडित]
लज्जेने जड, दांभिक व्रतिपणे, कापट्य शौचें गणी
शौर्ये निर्दय, आर्जवें लुडबुड्या, कीं दीन सद्भाषणीं
मानेच्छा तरि मूर्ख, कीं बडबड्या वक्ता, निकामी भला
ऐसा तो गुण कोणता खल-जनी नाहीच जो निंदिला ? ll ५ ll


[वसंततिलका]
मी जीस चिंतित असें न रुचें तिला मी
माने तिला अपर तो नर अन्यगामी
संतुष्ट मध्दिषयिं आन वधूच पाहीं
धिक तीस, त्यास, मदनास, इला, मलाही ll ६ ll


[द्रुतविलंबित]
दुबळिकेंत पसा यव इच्छितो
प्रभुपणीं धरणी तृण मानितो
म्हणुनियां कृपणत्व उदारता
घडतसे समयोचित तत्वतां ll ७ ll


[शार्दूलविक्रीडित]
तोयाचें परी नांवही न उरतें संतप्त लोहावरी,
तें भासे नलिनीदलावरि पहा सन्मौक्तिकाचे परी,
तें स्वातीस्तव अब्धिशुक्तिपुटकीं मोतीं घडे नेटकें,
जाणा उत्तममध्यमाधम दशा संसर्गयोगें टिके. ll ८ ll



- वामन पंडित(वामन नरहरी शेष)

बिकट वाट वहिवाट

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको
संसारामधि ऐसा आपला, उगाच भटकत फिरुं नको
चल सालसपण धरुनी निखालस, खोट्या बोला बोलुं नको
अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरुं नको
नास्तिकपणि तूं शिरुनी जनाचा, बोल आपणा घेऊ नको
आल्या अतिथा मुठभर द्याया मागेंपुढतीं पाहुं नको
मायबापांवर रुसूं नको
दुर्मुखलेला असूं नको
व्यवहारामंधी फसूं नको
कधीं रिकामा बसूं नको
परी उलाढाली भलभलत्या, पोटासाठी करुं नको ॥१॥


वर्म काढुनी शरमायाला, उणे कुणाला बोलुं नको
बुडवाया दुसर्‍याचा ठेवा, करुनी हेवा, झटूं नको
मी मोठा शहाणा, धनाढ्यही, गर्वभार हा वाहुं नको
एकाहुनी चढ एक जगामंधी, थोरपणाला मिरवु नको
हिमायतीच्या बळे गोरगरीबांला तूं गुरकावु नको
दो दिवसांची जाईल सत्ता, अपेश माथा घेउ नको
उणी तराजू तोलू नको
गहाण कुणाचे डुलवु नको
उगिच भीक तूं मागुं नको
स्नेह्यासाठी पदरमोड कर, परंतु जामिन राहुं नको ॥२॥


उगीच निंदा स्तुती कुणाची, स्वहितासाठी करुं नको
बरी खुशामत शाहण्याची, परि मूर्खाची ती मैत्री नको
कष्टाची बरी भाजी-भाकरी, तूपसाखरे चोरुं नको
दिली स्थिती देवाने तींतच मानी सुख, कधिं विटूं नको
असल्या गांठी धनसंचय, कर सत्कार्यी व्यय, हटूं नको
आतां तुज गुज गोष्ट सांगतो, सत्कर्मा तूं टाकू नको
सुविचारा कातरुं नको
सत्संगत अंतरुं नको
द्वैताला अनुसरुं नको
हरिभजना विस्मरुं नको
सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको ॥३॥



कवी — अनंतफंदी (अनंत भवानीबावा घोलप)

असाच

वेगळीच जात तुझी; वेगळाच ताल
तूं अफाट वाट तुझी; एकटाच चाल.

एकटाच चालत जा; दूर दूर दूर
गात गात तूंच तुझा; एकटाच सूर

एकटाच चालत जा; उंच आणि खोल
बोल आणि ऐक पुन्हा; तूं तुझाच बोल

तूं असाच झिंगत जा; विस्मरून पीळ
तूं असाच फुंकीत जा; अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा; भास तूं तुझेच
शांततेत ऐकत जा; श्वास तूं तुझेच

खोल या दरीत अशा; गर्द साऊलीत
हो निमग्न तूंच तुझ्या; मंद चाहुलीत.


- ना. घ. देशपांडे

7 August 2010

ज्योत

आधीं होते मी दिवटी
शेतकर्‍यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतुन मिणमिणती !

समई केले मला कुणी
देवापुढतीं नेवोनी
निघुनी आले बाहेर
सोडीत काळासा धूर !

काचेचा मग महाल तो
कुणी बांधुनी मज देतो
कंदिल त्याला जन म्हणती
मीच तयांतिल परि ज्योती.

बत्तिचे ते रूप नवे
पुढे मिळाले मज बरवें
वरात मजवांचून अडे
झगझगाट तो कसा पडे !

आतां झाले मी बिजली
घरे मंदिरें लखलखली
देवा ठाउक काय पुढें
नवा बदल माझ्यांत घडे.

एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांला
कसलेही मज रूप मिळो
देह जळो अन् जग उजळो !


वि. म. कुलकर्णी

डरांव डरांव (बालगीत)

आभाळ वाजलं धडामधूम,
वारा सुटला सूं सूं सूं
विज चमकली चक चक चक,
जिकडे तिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो,
पाणी वाहिले सो सो सो
पाण्यात बोट सोडली, सोडली
हातभर जाऊन बुडली, बुडली.
बोटीवर बसले बेडूकराव
बेडूक म्हणाला डरांव डरांव.


— सरिता पदकी

इंजिनदादा

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या


- अज्ञात

लाला टांगेवाला

लाल टांगा घेऊनी आला, लाला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

कुडता लालेलाल त्याची तुमान लालेलाल
टोपी लालेलाल त्याचा गोंडा लालेलाल
लालेलाल गोंडा उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

टांगा लालेलाल त्याचा घोडा लालेलाल
चाबुक लालेलाल त्याचा लगाम लालेलाल
लालेलाल चाबूक उडवित आला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

लाल परकर नेसून आली लीला बोले त्याला
"चल रे लाला, ने रे मला, माझ्या गावाला"
लीला बसली टांग्यामध्ये टांगा सुरू झाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला

झाडे लालेलाल त्यांची फुले लालेलाल
रस्ता लालेलाल त्याचा धुरळा लालेलाल
लालेलाल धुरळा उडवित गेला टांगेवाला
ऐका लाला गातो गाणे लल्लल लल्लल ला


- नारायण गोविंद शुक्ल

2 August 2010

जे उरात उरते

जो गंध फुलांतून झरतो,
वार्‍याच्या उरी उतरतो;
होउन लेखणी वारा,
मग भवतालावर लिहितो.

जी वाफ जलाची होते,
ती मनी नभाच्या शिरते,
बेधुंद सरींनी गाणे
धरतीवर उपडे होते !

नभ, वार्‍याचेच असे हे
औदार्य असावे थोर
नि:संग किती घेताना,
देताना नसतो घोर !

मी भरून घेतो सारे
हृदयाच्या काठोकाठ,
शब्दांतून देताना का
पाझरता होतो माठ ?

मोकळी वाटती झाडे
शिशिरात ढाळूनी पाने
पाळुन मुळांशी बसली
आहेत उद्याची स्वप्ने.

शब्दांतून देऊन थोडे
जी उरात उरते काही;
ती प्रेरक शक्ती मजला
जगण्याची देते ग्वाही !


— खलील मोमीन

विद्याप्रशंसा

[आर्या]

विद्येनेंच मनुष्या आलें श्रेष्टत्व ह्या जगामाजीं;
न दिसे एकहि वस्तू विद्येनेंही असाध्य आहे जी ll १ ll

व्यासादिक आद्य मुनी कवि अर्वाचीन सर्व थोर तसे
म्हणती एकमतें कीं, धन विद्यासम नरास अन्य नसे ll २ ll

देउनि किंवा भोगुनि उणें न होतां सदैव वाढतसे
ऐसे एकच विद्या-धन, अद्भुत गुण न हा दुज्यांत वसे ll ३ ll

न बलात्कारें राजा, न चोर कपटें, जया हरायास
होई समर्थ, ज्याच्या अल्पहि संरक्षणीं न आयास ll ४ ll

नानाविध रत्नांचीं कनकाचीं असति भूषणें फार;
परि विद्यासम एकहि शोभादायक नसे अलंकार ll ५ ll

या सार्‍या भुवनीं हित-कर विद्येसारखा सखा नाहीं;
अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणें नसे कांहीं ll ६ ll

गुरुपरि उपदेश करी, संकट्-समयीं उपायही सुचवी,
चिंतित फल देउनियां कल्पतरूपरि मनोरथां पुरवी ll ७ ll

विद्याबलसम अढळे न दुजें बल कोणतेंहि या लोकीं;
तीनें निजप्रभावें वश केलें सकल विश्व, अवलोकीं ! ll ८ ll

क्षुद्रा पशुपक्ष्यांची काय कथा? पांचही महाभूतें
ज्ञानबळें आकळुनी केलें मनुजें स्वदाससम त्यांतें ll ९ ll

विसरुनि परस्परांचा विरोध जल वन्हि सेविती त्यातें;
दासांपरि वश होउनि करिती त्याच्या समस्त कृत्यांतें ll १० ll

त्याचीं वस्त्रें विणिती, रथ ओढिती, लोटितीहि नौकांतें;
बहु सांगणें कशाला? करिती तो सांगतो तयां तें तें ! ll ११ ll

मोठे मोठे तरुवर मोडी, फोडीहि जी शिलारशी,
विद्युल्लता नरें ती केली संदेशहारिका दासी ! ll १२ ll

विद्येच्या सामर्थें केला रवि चित्रकार मनुजानें;
होउनि अंकित वायुहि तुष्ट करी त्यास सुस्वरें गानें ! ll १३ ll

यापरि सकल सुखें जी देई, दु:खें समस्त जी वारी,
त्या विद्यादेवींते अनन्यभावें सदा भजा भारी ll १४ ll

नाहीं परोपकारापरि दुसरें थोर पुण्य हें वचन
सत्य असे तरि विद्यादानाशीं तुल्य पुण्य आणिक न ll १५ ll

ऐश्वर्यबलधनादिक सौख्यें प्रसवे समस्त जी कांहीं,
ती विद्या जो देई, तेणें वद काय तें दिलें नाहीं? ll १६ ll



– कृष्णशास्त्री चिपळूणकर


टीप: मूळ २३ आर्यांपैकी निवडक १६ आर्यांचा वेचा इथे देण्यात आला आहे.

ऋण

तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥
चित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥


— श्री. दि. इनामदार

ऋणाईत

स्वत:वरचा जगावरचा विश्वास जेव्हा उडून जातो..
माउलीची कूस बनून शब्दच मला जवळ घेतात ...
लाजिरवाणे असे जीणे अपमानाचे जगत जातो..
प्राण चुंबुन घुसमटलेले शब्दसखेच धीर देतात...

अंधारून येतात दिशा..चार भिंती एक छप्पर..
काळोखात बुडून जाते..झाडे खातात मुकाट मार..
चिक चिक माती रप रप पाय..ठणकणारी जखम जशी..
असे होते मन आणि शब्दच होतात सहप्रवासी..

प्रवासाच्या सुरुवातीला वळणवेड्या मार्गावरून मरण येते
कवेत घेउन माझ्या आधी शब्दच त्याचे स्वागत करतात
ऋणाईत मी शब्दांना सर्वस्वाने ओलीस जातो..
प्रारब्धाच्या प्रकाशधारात ऋणाईत गाणे गातो...


कवी - केशव तानाजी मेश्राम